गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून सहकारी पाणी पुरवठा संस्था व खाजगी कृषीपंपधारक शेतकरी यांच्या कृषिपंपांना तसेच घरगुती वापरावर भारनियमन चालू केले आहे.
सध्या उन्हाचा तडाका वाढला असताना कृषिपंपांना किमान १२ तास वीज मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे , परंतु महावितरण कंपनीने अचानक भारनियन चालू करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे.
त्याचबरोबर, महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सतत होणाऱ्या अपमानास्पद वागणूक, ट्रान्सफॉर्मर स्वखर्चाने बसवण्याची आलेली वेळ आणि इतर तक्रारी घेऊन आज महावितरणचे मुख्य अभियंता यांना जाब विचारला.
तसेच, येत्या चार पाच दिवसांमध्ये महावितरण कंपनीने जर भारनियमन रद्द नाही केले तर दहा हजार लोकांसहित महावितरण कंपनीला घेराव घालणार असल्याचेही त्यांना सांगितले.
यावेळी, आमदार चंद्रदीप नरके, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, पंचायत समिती सभापती राजू सूर्यवंशी, कोल्हापूर दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन रावळ, NSUI अध्यक्ष पार्थ मुंडे, शहराध्यक्ष दीपक थोरात, इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी, आदींसह कोल्हापूर जिल्हातील सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.